भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाल आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत तब्बल २८ जण मृत्युमुखी पडले आहेत. काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खासदार डॉ. निलेश लंके यांच्याकडून मदत पुरवली जाणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील २५ ते ३० पर्यटकांशी संपर्क करून त्यांना परतण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही खासदार लंके यांनी दिली आहे. या पर्यटकांनी खासदार लंके यांच्याशी संपर्क साधला आहे. खासदार लंके यांनी सर्व पर्यटकांची आस्थेने चौकशी करून आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली आहे. काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांना ठार मारल्यानंतर तेथील परिस्थिती तणावपुर्ण असून तिथे पर्यटनासाठी गेलेले देशाच्या विविध भागांतील पर्यटक भितीच्या छायेखाली असल्याची माहिती मिळाल्याने खासदार लंके सध्या या पर्यटकांच्या मदतीसाठी तैनात झाले असल्याचे समजते.
(संग्रहित दृश्य.)
खासदार निलेश लंकेंकडून पर्यटकांची विचारपूस…..
या हल्ल्यानंतर काश्मीर ते जम्मू हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. तो पुर्ववत सुरू करण्यात आला असून खासदारा डॉ. निलेश लंके व पर्यटकांचा संवाद झाल्यानंतर या पर्यटकांनी खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे जम्मू येथे यावे. जम्मूतून या पर्यटकांना रेल्वेची तिकीटे तातडीने मिळवून देण्यासाठी आपले कार्यालय सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही खासदार निलेश लंके यांनी दिली आहे. या पर्यटकांच्या परतीच्या तिकीटासाठी आपले पत्र ही रेल्वे प्रशासनास देण्यात येईल असेही यावेळी खासदार लंके यांनी प्रवाशांना सांगितले. या प्रवाशांना विमानाने परतण्यासंदर्भातही खासदार लंके यांनी संबंधितांशी चर्चा केली. मात्र अतिरेकी हल्ल्यात ठार झालेले पर्यटक व त्यांचे नातेवाईक यांना हवाई प्रवासात प्राधान्य देण्यात येत असल्याने हवाई मार्गाने परतण्यासाठी सध्या तरी अडचणी येत आहेत. त्यामुळे या पर्यटकांनी जम्मूवरून रेल्वेमार्गाने अहिल्यानगरकडे यावे तसेच दरम्यान नगरपर्यंत पोहचेपर्यंत काही अडचणी आल्यास संपर्कात राहण्याचे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले. आहे.