अहिल्यानगर : दि. १६ मे जिल्ह्यात सुरक्षितता आणि सार्वजनिक हित लक्षात घेता ड्रोन आणि इतर मानवरहित हवाई यंत्रांच्या वापरावर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ च्या अधिकारांचा वापर करत हा आदेश काढला आहे. या आदेशानुसार, जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे ड्रोन, क्वाडकॉप्टर, यूएव्ही यूएएस किंवा तत्सम मानवरहित हवाई उपकरण उडवणे चालवणे किंवा वापरणे पूर्णतः निषिद्ध आहे. ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही काळात देशभरात ड्रोनच्या गैरवापरामुळे निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या धोक्यांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर छायाचित्रण शेती, वाहतूक आणि सर्वेक्षणासाठी केला जात असला. तरी काही वेळा गैरकायदेशीर किंवा संशयास्पद कृतींसाठी देखील याचा वापर होतो. विशेषतः संवेदनशील क्षेत्रांमध्ये ड्रोनद्वारे माहिती गोळा करणे किंवा सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान सुरक्षेचा भंग होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. हा आदेश तातडीने प्रभावी झाला असून, दि.३ जून २०२५ पर्यंत लागू राहणार आहे. यानंतर परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधित व्यक्तींना दंड अथवा कारावासाची शिक्षा होऊ शकते.आपत्कालीन सेवा, पोलिस, लष्कर किंवा अधिकृत सर्वेक्षण एजन्सी यांना विशिष्ट परवानगीनंतर ड्रोन वापरास परवानगी असू शकते. मात्र त्यासाठीही प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.