अहमदनगर – राजकारणापासून किंवा राजकीय माहितीपासून कोणीही वंचित असेल असे अद्यापही वाटत नाही. प्रत्येकाला सत्तेत रस आहेच,मुख्यमंत्री पदावरून भाजपासोबत बिनसल्यानंतर लाचार झालेल्या शिवसेनेला एकेकाळी विरोधक असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेनेचा मुख्यमंत्री विराजमान करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र फक्त अडीच दिवसच मुख्यमंत्री मंत्रालयात गेले असा आरोप विरोधकांच्या टोळीने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केले. एकनाथ शिंदेंच्या यशस्वी बंडानंतर शिवसेना तुटली आणि शिवसेनेत दोन गट झाले. राज्यभर कार्यकर्त्यांची गोची झालीच,एकत्र आलेल्या शिवसेना,राष्ट्रवादी,आणि काँग्रेस या पक्षांमध्ये संगनमताने एक निर्णय घेण्यात आला की,एकमेकांच्या पक्षांवर,नेत्यांवर टीका करायची नाही,विरोध करायचा नाही.तसं शिवसेना (शिंदे गट) आणि भाजापामध्ये देखील ठरल्याचे समजते.
परंतु वरिष्ठांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांना मान्य असेलच असे नाही. त्याचे दर्शन सर्वप्रथम नगरकरांना लाभलं आहे.अहमदनगर महानगर पालिकेमध्ये बुधवार (दि.२०) रोजी महासभा पार पडली. या महासाभेमध्ये एकाच विषय गाजला तो म्हणजे तारकपूरमधील इंदिरा कॉलनीचे नामांतर हा विषय विरोधीपक्षनेते संपत बारस्कर आणि नगरसेवक कुमार वाकळे,नगरसेवक सागर बोरुडे यांनी उचलून धरला आणि नामांतर करून ज्या व्यक्तीचे नाव या कॉलनीला देण्यात येणार आहे. त्या व्यक्तीचे समाजासाठी काय योगदान आहे हे सभागृहाने आम्हाला सांगावे अशी मागणी सुरु केली. लक्ष्मीदर्शनाच्या अपेक्षेपोटी बसलेल्या नेत्यांना त्याचे उत्तरच सुचेनासे झाले होते.
नेमकं प्रकरण काय ?
अहमदनगर महानगर पालिकेच्या महासभेत एक मुद्दा खूपच गाजला त्याला कारणही तसेच आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) तरुण नगरसेवकांनी महासभेत तारकपूर येथील इंदिरा कॉलनीचे नामांतर करण्याचा प्रस्ताव महासभेत मांडला होता.माजी.पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांचे नाव असलेल्या इंदिरा कॉलनीचे नाव बदलून मटकाबुकी आलेल्या मद्यान यांचे नाव देण्याचा हट्ट धरला होता.महासभेत मांडलेल्या या बालिश प्रस्तावावर एकच हश्या पिकला,मटका बुकीचे नाव धेण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकाचा महासभेत पोपट झाला.आपला प्रस्ताव मुळात चुकीचा असल्याचे भान होताच आपल्या चुकीचा पश्चाताप करत या नगरसेवकाने महासाभेतून पळ काढला असल्याचे उपस्थित नगरसेवकांनी टाईम्स ऑफ अहमदनगरशी (TIMES OF AHMEDNAGAR) खासगीत बोलतांना सांगितले.
भारतरत्न विरुद्ध मटकाबुकीच्या नावावरून वाद.
भाजपच्या त्रासाला कंटाळून आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या घड्याळावर चालवत सत्तेत विराजमान झालेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) सेना वाचवता आली नाही. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर द्विगुणीत दुखी झालेल्या शिवसेना (ठाकरे गट) कॉंग्रेसने आपला हात देत अजून मजबूत करण्याचे काम केले. शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेस पक्ष जरी राज्याच्या राजकारणात एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकजूट नसल्याचे समजते. कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्या तथा माजी.पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचे नाव हटवून मटकाबुकी मद्यान याचे नाव देण्याचा आग्रह या शिवसेनेच्या नगरसेवकाने केला. पण देशाचे नेते व त्यांच्या योगदानाच्या बाबतीत अभ्यास असलेले नगरसेवक या मुद्द्यावर आक्रमक झाले होते.नगरसेवक बारस्कर म्हणाले माजी.पंतप्रधानांच्या नावाला हटवून तुम्ही कोणाचे नाव देत आहात,एका मटका बुकीचे ? त्यांचे समाजासाठी काय योगदान आहे हे आम्हाला सांगा म्हणजे आम्ही त्यांचे आदर्श घेऊ असा संताप त्यांनी सभागृहात व्यक्त केला आहे.त्यांच्या मदतीला कुमार वाकळे आणि सागर बोरुडे धावून आले आणि बारास्कारांच्या सोबतीने वाकळेंनी आणि बोरुडेंनी इंदिरा गांधी यांनी देशासाठी केलेल्या त्याग आणि योगदानाबद्दल सांगत या प्रस्तावाला विरोध केला.
खुर्ची वाचवण्यासाठी राजकारण करणे हे जरी योग्य असले तरी कोणत्या विषयावर राजकारण केले पाहिजे हे कळणे कठीणच असते.काँग्रेसपक्षाच्या हाताला धरून चाललेल्या शिवसेनेच्या नगरसेवकाने माजी.पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या नावाच्या कॉलनीला विरोध केला आहे.तारकपूर येथील इंदिरा गांधी कॉलनीचे नाव बदलून एका मटकाबुकीचे नाव देण्याचा बालिश आग्रह धरल्याचा आरोप काही नगरसेवकांनी खासगीत लावला आहे.या प्रस्तावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे संपत बारस्कर, कुमार वाकळे, सागर बुरुडे यांनी विरोध केला.
काळेंच्या सर्कसमध्ये शिवसेनेच्या वाघाचा लाड ?
शिवसेनेच्या (ठाकरे गट) नगरसेवकाने तारकपूर येथील इंदिरा कॉलनीचे नाव बदलून मटकाबुकी मद्यान यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला होता.परंतु शब्दांचे शस्त्र घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागलेले सैनिक किरण काळे अद्यापही या विषयवावर व्यक्त झालेले नाहीत.काळेंच्या प्रत्येक आंदोलनाला एक वेगळे वळण असते, नगरकरांच्या अडचणींसाठी काळेंच्या धडपडीला माजी.महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी गांभीर्याने घेऊन काळेंना शहराचा आमदार व्हावेच लागेल असे बोलल्याचे समजते ,अशा प्रकारच्या बातम्या देखील काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या घड्याळाला वारंवार हलवून कर्तव्याच्या वेळेचे दर्शन नगरकरांना देण्यासाठी घड्याळाला सतत चार्जिंगचा डोस देऊन सळो की पळो करणारे काळे शिवसेनेच्या छोट्या वाघाला घाबरले की काय ? काळेंच्या सर्कसमध्ये शिवसेनेच्या वाघाचा लाड आहे का असे देखील सवाल नगरकर खासगीत उपस्थित करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.