अहिल्यानगर- शहरातील माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी तब्बल साडेसोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तरीही कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. कारण? महापालिकेच्या नगररचना विभागाकडून आवश्यक असलेली नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळत नसल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. यामुळे प्रवाशांना उन्हातान्हात ताटकळत बसची वाट पाहावी लागत आहे. संतप्त माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी येत्या दोन दिवसांत एनओसी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. माळीवाडा बसस्थानक हे शहरातील प्रवाशांचा महत्त्वाचा आधार आहे. मात्र जुनाट इमारत आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा १६.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवला. या निधीतून बसस्थानकाची आधुनिक इमारत बांधण्याची योजना आहे. जी प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देईल. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यापूर्वीच प्रशासकीय अडथळ्यांनी या योजनेचा घात केला आहे.
(संग्रहित दृश्य.)
माळीवाडा बसस्थानकाच्या कामात एनओसीचा अडथळा…
माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी सर्वप्रथम महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळणे आवश्यक आहे. परंतु या एका कागदपत्रासाठी गेले अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते,नगररचना विभागाचा ढिसाळ कारभार आणि निष्क्रियता यामुळे प्रकल्प रखडला आहे. फायली दोन-दोन महिने पुढे सरकत नाहीत. एक साधी एनओसी देण्याची क्षमता अधिकाऱ्यांमध्ये नाही. याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. असे भोसले यांनी ठणकावून सांगितले. जुनी इमारत पाडल्यानंतर नव्या बांधकामाला त्वरित सुरुवात होणे अपेक्षित होते. पण एनओसीच्या अभावामुळे काम थांबले आहे. माळीवाडा बसस्थानकाची जुनी इमारत पाडल्यानंतर सध्या तिथे कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. प्रवाशांना उन्हात पावसात किंवा थंडीत ताटकळत बसची वाट पाहावी लागत आहे. विशेषतः महिला ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. बसस्थानकाच्या आधुनिक इमारतीचे स्वप्न साकार होण्याची प्रतीक्षा असताना प्रवाशांच्या या हालांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. आंदोलनाचा इशारा प्रशासकीय ढिसाळपणामुळे वैतागलेल्या गणेश भोसले यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी महापालिका आयुक्तांना स्पष्ट शब्दांत सांगितले की येत्या दोन दिवसांत एनओसी मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रवाशांचे हाल पाहून आता गप्प बसणार नाही. प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे त्यांनी ठणकावले. एनओसी मिळाली? दरम्यान या प्रकरणी नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक स्नेहल यादव आणि नगररचनाकार वैभव जोशी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की माळीवाडा बसस्थानकाच्या बांधकामासाठी एनओसी मंगळवार (दि.१५) एप्रिल रोजीच देण्यात आली आहे. जर ही बाब खरी असेल तर आता प्रश्न उरतो की ही माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत का पोहोचली नाही? आणि कामाला सुरुवात का झाली नाही? या प्रश्नांनी प्रशासकीय समन्वयाच्या अभावावर बोट ठेवले आहे.