अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी शकीला पठाण यांना अमानुष मारहाण झाल्याबाबत आरोपीस त्वरित अटक करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष युवराज पाटील व सरचिटणीस अशोक नरसाळे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, पोलीस उपाधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपस्थित दिलीप नागरगोजे किसन भिंगारदे, माणिकराव घाडगे, राम कार्ले, शहाजी नरसाळे संजय डौले, द्वारकानाथ आंधळे अमोल खाटीक, मेघश्याम गायकवाड, सुभाष दहिफळे दत्तात्रेय गर्जे रवींद्र लांबे आदींसह ग्रामपंचायत अधिकारी उपस्थितीत होते. निवेदनात म्हटले आहे शकीला पठाण या ग्रामपंचायत अधिकारी या पदावर कार्यरत असून त्या ग्रामपंचायतचे नियमित कर्तव्य बजावत असताना त्यांना गावातील अतिक्रमण काढल्याचा राग मनात धरून दहा ते अकरा लोकांनी अमानुष मारहाण केली. याबाबत रीतसर फिर्याद राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे. तसेच शकीला पठाण यांना मदतीसाठी व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या संबंधित दहा अकरा लोकांनाही जबर मारहाण केली आहे. यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये भयावह व परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अक्षरशः महिला ग्राम पंचायत अधिकारी यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. शकीला पठाण यांना गावात आल्यास जीवे मारण्याचे धमकी देण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष युवराज पाटील म्हणाले सदरील भ्याड हल्ल्याचा निषेध राहुरी तालुक्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी केला आहे. ग्रामपंचायत अधिकारी भयभीत होऊन दहशतीखाली आहेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना भयमुक्त व निर्भय वातावरणात काम करता यावे याकरिता सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सदर आरोपीवर कायदेशीर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वतीने काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.