अहिल्यानगर : पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांची मुदत ठेव परत न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठेवीदार अमेय रमेश मुदकवी (वय ५० रा. गृहशिल्प सोसायटी, बागरोजा, दिल्ली गेटजवळ, अहिल्यानगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या संचालकांसह १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४२ लाख सात हजार ७१० रुपये मुदत ठेव म्हणून संस्थेत जमा करूनही रक्कम व व्याज न मिळाल्याचा आरोप मुदकवी यांनी केला आहे. सत्यशील अविनाश अकोले, अनुप सत्यशील अकोले, शिल्पा शाम अकोले, शितल सत्यशील अकोले, शाम अविनाश अकोले (सर्व रा. पूर्णवाद नगर, रिंग रस्ता, जि. जळगाव), वेड्डू गणेश लोखंडे (रा. आंबेडकरनगर, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव), महेंद्र मनोहरलाल शर्मा (रा. आठवडे बाजार, बुर्हाणपूर रस्ता, रावेर, जि. जळगाव), जितेंद्र कृष्णमूर्ती कुलकर्णी (रा. सहकारनगर, सावेडी, अहिल्यानगर), नितीन शंकर राणे, विजय शंकर राणे (दोघे रा. क्रांती चौक, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव), नामदेव पांडुरंग कोळी (रा. विठ्ठलनगर, जि. जळगाव), महेश सुधाकर कुलकर्णी (रा. केडगाव, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
मुदत संपल्यानंतर संबंधितांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ…
मुदकवी यांनी आपल्या वडील रमेश विष्णूपंत मुदकवी, आई उज्वला रमेश मुदकवी व भाऊ निखील रमेश मुदकवी यांच्या नावाने दि.५ नोव्हेंबर २०२२ ते दि.१९ डिसेंबर २०२४ या कालावधीत पूर्णवाद पतसंस्थेच्या अहिल्यानगर शाखेत रोख स्वरूपात गुंतवणूक केली होती. संस्थेने त्याबदल्यात १३ टक्के परताव्याचे आश्वासन देत अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवले होते. रक्कम जमा करताना सर्व कागदपत्रे व मुदतठेव पावत्या संस्थेने दिल्या होत्या. परंतु, मुदत संपल्यानंतर संबंधितांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. ४६ ते ३०० दिवसांपर्यंत मुदत वाढवून केवळ वेळ काढूपणा करत वारंवार मागणी करूनही केवळ आज देतो, उद्या देतो अशा आश्वासनाखाली मुदकवी कुटुंबासह इतर ठेवीदारांना संस्थेच्या कार्यालयातून परत पाठवण्यात येत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी दि.२८ जानेवारी २०२४ रोजी सभासदांची बैठक घेण्यात आली होती, यावेळी संस्थेच्या संचालकांनी दि.३१ मार्च २०२४ पर्यंत सर्व रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. उलट व्यवस्थापक व संचालक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने ठेवीदारांची विश्वासघाताने फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.