अहमदनगरमध्ये बिबट्याची दहशत वाढली ; बिबट्याने भ्याड हल्ला करत दोन तरुणांना केले गंभीर जखमी.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AKOLE BIBATYA NEWS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर : अकोले तालुक्यातील वीरगाव येथे शुक्रवारी (दि. २०) बिबट्याने भर दिवसा दोघांवर प्राणघातक हल्ला चढवला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन्ही तरुण जखमी झाले असून थोडक्यात बचावले आहेत.या घटनेमुळे गावात शेतकरी आणि ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. या घटनेची वन विभागाने गंभीर दखल घेतली असून सकाळपासूनच अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
याबाबत वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि सध्या वीरगाव शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस आणि मक्याचे पीक आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत आहे. त्यातच भक्ष्याच्या शोधात बिबट्यांचा संचार असल्याने रात्री आणि दिवसाही दर्शन होत आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांची सकाळी पिकाला पाणी देणे आणि डेअरीला दूध घालण्याची लगबग सुरू असताना वीरगावमध्ये बिबट्याने हल्ला केला आहे. बछडे चुकल्या मादीने हल्ला केला असल्याचे समजते. यामध्ये पहिल्यांदा बस्तीराम रामचंद्र गांगड यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन जखमी केले. त्यानंतर माधव पोपट देशमुख यांच्यावर हल्ला करुन जखमी केले असल्याची माहिती समोर आली आहे.
(संग्रहित दृश्य.)
विनाकारण घराबाहेर न पडण्याचे वनविभागाचे आवाहन.
यातील जखमी बस्तीराम गांगड यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविले आहे तर माधव देशमुख यांच्यावर संगमनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन हल्ल्यानंतर संदीप लक्ष्मण वाकचौरे आणि सार्थक संदीप वाकचौरे हे शेतात दुचाकीवरुन जात असताना त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला परंतु ते दोघेही बालंबाल बचावले.या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला दिली. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धिंदळे, वन परिमंडळ अधिकारी पंकज देवरे यांसह अधिकारी व कर्मचारी पिंजरे घेऊन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वन्यजीव बचाव पथकालाही पाचारण केल्यानंतर बाळासाहेब कडलग यांच्या गिन्नी गवताच्या शेतात दडून बसलेल्या बछड्याला शोध मोहीम राबवून पिंजऱ्यात जेरबंद केले. तर मादीला पकडण्यासाठी तीन ठिकाणी पिंजरे लावले असून वन विभाग येथे तळ ठोकून आहेत. या, यामुळे नागरिकांनी लहान मुले, विद्यार्थी व वृद्धांची काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये आणि खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.