२६ जानेवारी रोजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आंदोलकांना सामोरे गेले आणि त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच त्यासंबंधी काढलेली अधिसूचना जरांगे पाटील यांना सोपवली. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्यावर सध्या आंदोलकांनी आणि डॉक्टरांनी जबरदस्तीने सलाईन लावून उपचार सुरू केले आहेत. सकाळी त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला होता. तर दुपारपासून त्यांना पोटदुखी सुरू झाली आहे. त्यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे अंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळी त्यांच्या समर्थकांची आणि आंदोलकांची गर्दी वाढू लागली आहे.