TIMES OF AHMEDNAGAR
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. त्यात नाशिक परिक्षेत्रासह नाशिक ग्रामीण आणि जळगाव पोलिस अधीक्षकांचा समावेश आहे. नाशिक परिक्षेत्रासाठी दत्तात्रय कराळे हे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहतील. तर, नाशिक ग्रामीणला विक्रम देशमाने आणि एस.सी.व्ही.महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारतील.
बी.जी.शेखर यांची बदली, दत्तात्रय कराळे हे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहतील.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहे. यासाठी ३१ जानेवारी ही शेवटची मुदत असल्याने गृह विभागाने राज्यातील ४४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात उत्तर महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सध्या कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांची बदली झाली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश अद्याप निघालेले नाहीत. ते स्वतंत्र काढण्यात येतील. त्यांच्या जागी ठाणे शहर पोलिस दलात सहआयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कराळे यांनी २०१७ मध्ये जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे. नाशिक परिक्षेत्रात नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर जिल्ह्याचा समावेश होतो.