अ.नगर : एका तासाच्या आत शिर्डीत साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे (३ फेब्रुवारी ) तीन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका तरुणाला कामावर जात असताना प्राणघात हल्ला करत गंभीर जखमी करण्यात आले आहे. या हल्ल्यात संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी आहे . दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली आहे. या घटनेत नितीन कृष्णा शेजुळ ,सुभाष साहेबराव घोडे या दोन साई संस्थान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत . घटनेची माहिती सकाळीच मिळूनही पोलीस उशिरा आल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब करत आहे . हत्याकांडाला अपघात असल्याचं सांगितलं जात असल्याने कुटुंबीय मोठा आक्रोश करत आहेत .शिर्डीमध्ये तणावाचे वातावरण आहे.
(संग्रहित दृश्य)
पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना चाकू हल्ला.
आंतरराष्ट्रीय देवस्थान असणाऱ्या शिर्डीमध्ये सोमवारी (३ फेब्रुवारी ) पहाटे तिघांवर चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका तासाच्या अंतरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली.यात एक तरुण गंभीर जखमी आहे. शिर्डीतील साई संस्थानमध्ये दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना ही घटना घडली आहे. यातील सुभाष साहेबराव घोडे हे करडोबा नगर चौकाचे रहिवासी आहेत .नितीन कृष्णा शेजुळ यांच्यावर साकुरी शिव तर गंभीर जखमी असलेल्या कृष्णा देहरकर याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात चाकू हल्ला झाला. अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना केलेल्या चाकू हल्ल्यात दोन कर्मचारी जागीच मृत झाले तर कृष्णा देहरकर गंभीर जखमी आहेत. हत्येचे कारण अजून स्पष्ट नसून पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत.
(संग्रहित दृश्य)
हत्येला अपघाताचे स्वरूप दिल्याचा मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आरोप.
शिर्डीमध्ये पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी तासाभराच्या अंतरात झालेल्या या चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे .एक तरुण गंभीर जखमी आहे .या घटनेची माहिती कळताच पोलिसांना कळविण्यात आले.मात्र घटना घडवून काही तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांचा पत्ता नव्हता. इथे कोणीही कोणासाठी लगबगीनं येत नाही असं मृत कुटुंबीय सांगत होते. घटनेची माहिती कळूनही उशिरा आल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय करत आहे. हत्येला अपघाताचे स्वरूप दिल्याने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने परिसर हादरला आहे. दुसरीकडे माहिती कळाल्याबरोबर तात्काळ आलो असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.