न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जर दोन प्रौढांमधील संमतीने झालेले संबंध नंतर तुटले किंवा दोघांमध्ये अंतर निर्माण झाले तर त्याला लग्नाचे खोटे वचन देऊन बलात्काराचा खटला करता येणार नाही. खंडपीठाने म्हटले आहे की, अशा प्रकरणांमुळे न्यायव्यवस्थेवर अनावश्यक भार पडतोच, शिवाय आरोपीच्या सामाजिक प्रतिमेलाही गंभीर नुकसान होते. सर्वोच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला की,केवळ वचन मोडणे हे खोटे वचन मानले जाऊ शकत नाही,जोपर्यंत आरोपीचा नातेसंबंधाच्या सुरुवातीपासूनच फसवणूक करण्याचा हेतू नसेल. खंडपीठाने म्हटले आहे की, लग्नाचे वचन मोडणे हे खोटे वचन आहे असे सांगून कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा खटला दाखल करणे चुकीचे आहे. या आधीही या ट्रेंडवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयासह, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील अमोल भगवान नेहूल यांच्यावरील बलात्काराचा खटला रद्द केला. आरोपी नेहुलने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी कारवाई रद्द करण्यास नकार देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत फौजदारी कारवाई संपवली.