दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.

नगर : हिंद सेवा मंडळ संचलित ज्युनियर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या एचएससी १२ वी बोर्डाच्या परीक्षेत कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तर इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील रात्रशाळेच्या गुणवत्ता यादीत ४ विद्यार्थिनींनी स्थान मिळवले. दिवसभर काम करुन रात्री शिक्षण घेणाऱ्या या होतकरु विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्दीने गुणवत्ता सिध्द केली. मासूम संस्था (मुंबई) यांच्या वतीने राज्यातील रात्रशाळांचे इयत्ता दहावी मधील प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते. राज्यातील रात्रशाळांमधून प्रविष्ट विद्यार्थ्यांमधून टॉप टेन (१०) विद्यार्थी निवडण्यात येतात यामध्ये चार विद्यार्थी भाई सथ्था नाईट हायस्कूलचे आहेत. दीक्षा रमेश गवळी (सचिन गायकवाड)(८६. ८० %) हिने रात्रशाळेतून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. मंदा भाऊसाहेब भोराडे (देवीचंद पवार)( ७६.८० %) यांनी राज्यात पाचवा तर इशिता विक्रम भोर व जयश्री जगन्नाथ वैरागर(राम वाघमारे) (७४.४०%) या दोन्हींनी आठवा क्रमांक मिळवला आहे.
शिरीष मोडक म्हणाले की, रात्र शाळेतील महिला विद्यार्थिनींनी उत्तम गुण मिळवणं ही साधी गोष्ट नाही. तर शिक्षणात मोठा खंड पडल्यावर पुन्हा अभ्यासाकडे वळणं हा एक धाडसी निर्णय असतो. घरातील जबाबदाऱ्या, कौटुंबिक अडचणी, सामाजिक बंधनं या सगळ्यांवर मात करत महिला स्वत:ची गुणवत्ता सिध्द करत आहेत. जेंव्हा शिक्षण घेण्याचा दृढ निश्चय घेतला जातो, तेंव्हा यश निश्चितच मिळते. या यशामागे केवळ विद्यार्थिनींचा दृढनिश्चय नाही तर शिक्षकांनी दिलेले समर्पित मार्गदर्शनही तितकंच मोलाचं आहे. राज्यातील रात्र शाळेत टॉप १० मध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश असणं हेच शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डॉ. पारस कोठारी म्हणाले की, रात्र शाळेत शिक्षक तळमळीने आणि समर्पणाने गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात. कठीण परिस्थितीतही गुरूंनी केलेले मार्गदर्शन हेच विद्यार्थ्यांच्या यशामागचं खरं कारण असतं. म्हणूनच रात्र शाळेतील यश हे खऱ्या अर्थाने गुरूंचेच आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. तर बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी सारडा महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे आवाहन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच वर्षभर शैक्षणिक मदत करणाऱ्या मासूम संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निकिता केतकर, संचालक कमलाकर माने, युवराज बोराडे व एसएससी प्रमुख शशिकांत गवस, गुरुप्रसाद पाटील यांचे प्राचार्य सुनील सुसरे यांनी आभार मानले व शैक्षणिक वर्ष २०२५-२६ यावर्षीचे इयत्ता आठवी ते बारावी कला, वाणिज्य शाखेसह नवीन देणे सुरू झाल्याची माहिती सर्व विद्यार्थी, पालकांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली दुराफे यांनी केले. आभार अमोल कदम यांनी मानले.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment