अहिल्यानगर शहरातील जुनं बसस्थानक आणि स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानक ही ठिकाणं आता गुन्हेगारांचे अड्डे बनली आहेत. या बसस्थानकांवर पर्स, दागिने आणि रोकड चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. चोरट्यांचा मुक्त संचार आणि पोलिसांचा निष्क्रिय तपास यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेषत: महिलांना लक्ष्य करून चोरटे गर्दीचा फायदा घेत हातसफाई करत आहेत. गेल्या आठवडाभरात तीन महिलांचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याच्या घटनांनी परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित केलं आहे. बसस्थानकांवर पोलिस चौकी असूनही ती बंदच असते. आणि पोलिसांचा धाक नसल्याने गुन्हेगार बिनधास्तपणे गुन्हे करत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. अहिल्यानगर हे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारं मध्यवर्ती शहर आहे. यामुळे जुन्या बसस्थानकावर ग्रामीण भागातून येणारे प्रवासी आणि पुणे बसस्थानकावर परजिल्ह्यांत जाणारे प्रवासी यांची दररोज प्रचंड गर्दी असते. राज्य सरकारने एसटी बस भाड्यात महिलांना सवलत दिल्याने महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पण या गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांच्या पर्स, गळ्यातील दागिने आणि रोकड चोरी करत आहेत. गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरटे गर्दीत मिसळून हातसफाई करतात, आणि प्रवासी लक्षात येईपर्यंत ते पसार होतात. यामुळे बसस्थानकांचं स्वरूप गुन्हेगारांच्या अड्ड्यांसारखं झालं आहे.
(संग्रहित दृश्य.)
पोलिसांचा निष्क्रिय तपास
गेल्या आठवडाभरात बसस्थानकांवर तीन मोठ्या चोरीच्या घटना घडल्या. (दि.११) मे २०२५ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास माळीवाडा बसस्थानक ते वाळुंज प्रवासादरम्यान मंडाबाई सर्जेराव नवले (वय ५५, रा. गुरव पिंपरी, ता. कर्जत) यांच्या पर्समधील ४०,००० रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र चोरीला गेलं. त्यानंतर (दि.१३) मे रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास पुणे बसस्थानकावर सुनंदा अरुण भारस्कर (वय ३५, रा. शिवाजीनगर, पुणे) यांच्या बॅगेतून १ तोळ्याचं सोन्याचं नेकलेस दोन अनोळखी महिला चोरट्यांनी चोरलं. (दि.१४) मे रोजी दुपारी १२ वाजता जुन्या बसस्थानकावर प्रियंका अविनाश सोनवणे (वय २४, रा. रेणुकानगर, अहिल्यानगर) यांच्या बॅगेतून ७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. या तिन्ही घटनांनी प्रवाशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. प्रियंका सोनवणे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या आई रुख्मिमी खेडकर यांच्यासह पाथर्डी येथील नातेवाइकांच्या लग्नासाठी माळीवाडा बसस्थानकावर गेल्या होत्या. लग्नासाठी त्यांनी ७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने (साडेचार तोळ्याचं पट्टी गंठण, दीड तोळ्याचं नेकलेस आणि एक तोळ्याचं झुंबर) बॅगेत ठेवले होते. पाथर्डीला जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढताना गर्दीतून आत जात असताना त्यांना बॅगेला हिसका बसल्याचं जाणवलं. बॅग तपासली असता, खालच्या बाजूला कटरने कापल्याचं दिसलं, आणि दागिने गायब झाले. याबाबत त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आणि अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदवला गेला. पोलिसांचा बसस्थानकांवर चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांचा तपास निष्क्रिय असल्याचा आरोप प्रवासी आणि स्थानिक करत आहेत. बसस्थानकांवर प्रवाशांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. पण ती नेहमीच बंद असते. चौकीत पोलिस कर्मचारी क्वचितच दिसतात. आणि चोरी किंवा भांडणाच्या घटना घडल्यास प्रवाशांना कोतवाली पोलिस ठाण्याकडे धाव घ्यावी लागते. पोलिसांचा धाक नसल्याने चोरटे आणि गुन्हेगार बिनधास्तपणे बसस्थानकांवर फिरतात. गेल्या आठवड्यातील चोरीच्या घटनांवर पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.