यंदाची ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलात मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाली. पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. मात्र, अंतिम सामन्यात पंचांकडून चुकीचा निर्णय झाल्याचे सांगत चांगलाच वाद झाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. उपविजेता पैलवान शिवराज राक्षेनं चक्क पंचाला लाथ मारल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यानंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर राजकीय वर्तुळातूनही टीका होऊ लागली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला राजकीय रंग मिळाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यातच, आमदार रोहित पवार यांनी नव्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचं आयोजन कराव, ही स्पर्धा शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी, असेही म्हटले होते.
(संग्रहित दृश्य.)
तसेच अहिल्यानगर येथील कुस्ती स्पर्धेत पैलवानांचा मान-सन्मान राखण्यात आला नसल्याचे आरोप रोहित पवार यांनी केला होता. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे. तुम्ही अजित दादांशी निगडित आहात म्हणून आम्ही थोडा मान-सन्मान राखतो, पण याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही, त्यांनी कुस्तीवर बोलू नये असं म्हणत अहिल्यानगरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पैलवानासाठी होती की राजकीय नेत्यांसाठी होती, असा सवाल उपस्थित करत स्पर्धेदरम्यान पैलवानांचा योग्य मानसन्मान झाला नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. रोहित पवारांच्या या टीकेला आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
आत्तापर्यंतच्या कुस्ती स्पर्धेत कोणी हभप महाराज नव्हते, किंवा कोणी क्रिकेटमधील व्यक्ती नव्हात. सर्व राजकीय माणसांनीच ही कुस्ती स्पर्धा पुढे नेली. अलिकडच्या काळात नव्याने राजकारणात येणाऱ्यांना लगेचच महाराष्ट्रात पुढे गेलं पाहिजे, म्हणून ते काहीही बोलतात. पण, थोडा वेळ लागेल, गडबड न करता सगळं करावं. आम्ही अजित दादांमुळे पडद्याआड घालतो, त्यांचा मान-सन्मान राखला जातो, असेही संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे.