TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | PAKISTAN | PRIME MINISTER NARENDRA MODI | PRIME MINISTER SHABAZ SHARIF | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्याला सर्व शेजारी देशांबरोबर शांतता आणि मैत्री हवी आहे, असं महत्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानने आपल्या शेजारील देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं बोललं जात आहे. तसेच प्रगती आणि शांतता एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तान शांततापूर्ण वातावरणाच्या बाजूने असल्याचंही शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी लष्कराच्या एका कार्यक्रमात बोलताना शाहबाज शरीफ यांनी हे विधान केलं आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं की पाकिस्तानला आपल्या सर्व शेजाऱ्यांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत. परंतु आपला देश कोणत्याही किंमतीत आपल्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही. तसेच पाकिस्तानचा इतर कोणत्याही देशाविरुद्ध आक्रमक करण्याचा कोणताही हेतू नाही. शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी पाकिस्तानने कायम महत्वाची भूमिका बजावली आहे. शांतता राखणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण प्रगती आणि शांतता एकमेकांशी जोडले गेलेले आहेत असं शाहबाज शरीफ यावेळी म्हणाले.
(संग्रहित दृश्य.)
राजकीय मतभेदांना द्वेषात बदलू देणार नाही.
या कार्यक्रमात पाकिस्तान लष्कराचे वरिष्ठ लष्करी आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी पाकिस्तान लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आपल्या भाषणात म्हटलं की देश राजकीय मतभेदांना द्वेषात बदलू देणार नाही. सैन्य आणि जनता यांच्यातील मजबूत संबंध हा दोघांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही शत्रूला पराभूत करण्यासाठी पाया म्हणून काम करेल. सशस्त्र दल आणि राष्ट्र यांच्यातील नाते घट्ट आहे. नैसर्गिक आपत्ती, परकीय शत्रुत्व किंवा दहशतवादाविरुद्ध युद्धाच्या घटनांमध्ये बचाव कार्य यासह सर्व क्षेत्रात राष्ट्राने सैन्याला नेहमीच बळकटी दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
काश्मीर पाकिस्तानसाठी नेहमीच महत्त्वाचा मुद्दा.
पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पंतप्रधान लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी असीम मुनीर यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. असीम मुनीर यांनी म्हटलं की, हा मुद्दा पाकिस्तानसाठी नेहमीच महत्त्वाचा असतो आणि हा केवळ राष्ट्रीय मुद्दा नसून तो प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाचा मुद्दा आहे.