तामिळनाडू : पठाणपुरा मार्गावरील भर वस्तीतील बियर बारमध्ये दोन पोलीस शिपाई व काही युवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.त्यानंतर पोलीस व युवक बियरबार मधून बाहेर पडले. दोन्ही पोलीस शिपाई घराकडे परत येत असताना मागून युवकांची टोळी आली आणि दोन्ही पोलीस शिपाई यांना गल्लीत गाठून गुप्तीने त्यांच्यावर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात दिलीप चव्हाण (वय ३६) या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला तर शिपाई समीर चाफले (वय ३४) हे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.७) रात्री १० वाजताचे सुमारास घडली आहे. दरम्यान जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून सर्रास हत्या, खून, होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात राहणारे व पोलीस विभागात कॉन्स्टेबल असलेले दिलीप चव्हाण व समीर चाफले शुक्रवार (दि.७) रात्री ९ वाजताच्या सुमारास पठाणपुरा मार्गावरील वैभव बानकर यांच्या पिंक पॅराडाईज या बियर बारमध्ये साध्या वेशात मद्य प्राशन करीत बसले होते. त्याच वेळी या बारमध्ये दाद महाल वॉर्डातील काही युवक देखील मद्य पीत होते. पोलीस शिपाई व युवकांमध्ये काही कारणावरून सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर शाब्दिक भांडण हातापाईवर गेले आणि एकमेकांना मारहाण केल्यानंतर बघून घेईल असा दम देत युवक व पोलीस शिपाई बार मधून बाहेर पडले.
(संग्रहित दृश्य.)
पोलिसांवर चाकूने हल्ला…
पोलीस शिपाई चाफले याचे घर बियर बारच्या मागे आहे. त्यामुळे शिपाई चाफले व चव्हाण पायदळ घराकडे जात असताना मागून युवकांची टोळी आली आणि रात्रीचा अंधार बघून गल्लीतच युवकांनी चव्हाण व चाफले या दोन्ही पोलिसांवर गुप्ती व चाकूने सपासप वार केले. यात युवकांनी चव्हाण यांच्या छातीत गुप्ती आरपार टाकल्याने तो तिथेच पडला तर चाफले यांच्या हात व छातीवर गुप्तीने वार केल्याने गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बघून आजूबाजूचे लोक धावले आणि दोन्ही पोलीस शिपाई यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी चव्हाण यांना मृत घोषित केले तर चाफले याला डॉ. चेपुरवार यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अति.पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकुरे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या हत्या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी वाढली आहे. खुनाचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समोर आली आहे. या प्रकरणी दाद महाल वॉर्ड येथील तीन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात आणखी काही युवकांचा समावेश आहे. ते फरार आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सांगितले.