दारू पिण्यावरून झालेल्या वादातून बापलेकाने शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकू भोसकून खून केला आहे. जितेंद्र गुर्जर वय ३५ असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (१३ मे) सायंकाळी वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत संघर्षनगर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाप-लेकाला अटक केली आहे. आनंदराव बावनकर वय ६० त्याचा मुलगा दिनेश बावनकर वय २६ सर्व राहणार संघर्षनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
स्त्रोत सोशल मिडिया
धारदार शस्त्राने हल्ला करत रक्तबंबाळ केले.
जितेंद्रला आईवडील आणि एक मोठा भाऊ आहे. जितेंद्र आपल्या कुटुंबासोबत राहत होता, बेरोजगार असल्याने जितेंद्रची त्याच्या घराजवळच राहणाऱ्या आरोपीशी ओळख होती. त्यामुळे आरोपीसोबत मैत्री होती. दिनेश आणि त्याचे वडील फर्निचरचे काम करतात. मंगळवारी सायंकाळी आरोपी आनंदराव आणि जितेंद्र हे दोघेही दारू पित बसले होते. दारूची नशा चढल्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता.त्यावेळी ते एकमेकांना शिवीगाळ करू लागले. वाद विकोपाला जाताच आनंदरावचा मुलगा दिनेश हा सुद्धा तेथे आला होता. मुलगा आल्याने वडिलांना बळ मिळाले. दोघांनीही जितेंद्रवर धारदार शस्त्राने हल्ला करत रक्तबंबाळ केले. जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळताच बापलेकांनी तेथून पळ काढला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले आहे. परिसरातच असलेल्या आनंदरावला पोलिसांनी लगेच अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी दिनेशच्याही मुसक्या आवळल्या आहेत. त्या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
नागपुरात तब्बल २९ हत्त्याकांड.
नागपुरात गेल्या जानेवारी ते एप्रिल महिन्यात तब्बल २९ हत्याकांड घडले आहेत. सर्वाधिक ११ हत्याकांड फेब्रुवारी महिन्यात घडले आहेत. उपराजधानीत गुन्हेगार आणि गुन्हेगारी वाढत असून टोळीयुद्धातून हत्याकांड घडण्याची संख्या वाढली आहे. यामुळे पोलिसांचा वचक संपल्याचे चित्र आहे.