TIMES OF AHMEDNAGAR
प्रेमप्रकरणातून शाळकरी मुलावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घेरा सिंहगड परिसरातील मणेरवाडीत घडली. याप्रकरणी हवेली पोलिसांनी दोन शाळकरी मुलांना ताब्यात घेतले असून, प्रेमप्रकरणातून शाळकरी मुलाचा खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. प्रकाश हरिसिंग राजपूत (वय १४, रा. मते गेट, मौजे मणेरवाडी, ता. हवेली, जि.पुणे असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या खुना प्रकरणी दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची त्याची आई अनिता हरिसिंग राजपूत (वय ३५) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजपूत कुटुंबीय मूळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील असंगी गावचे रहिवासी आहे. अनिता मणेरवाडीतील आनंदवन सोसायटी काम करतात. अनिता दोन मुलांसह सोसायटीतील कामगारांच्या खोलीत राहायला आहेत. त्यांचा मोठा मुलगा प्रकाश खानापूर येथील एका शाळेत नववीत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
शाळकरी मुलांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
प्रकाशची शाळा दुपारी सुटायची. शाळेतून आल्यानंतर तो जेवण करून झोपायचा. सोमवारी सायंकाळी गाढ झोपेत असलेल्या दोन शाळकरी मुलांनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला तातडीने शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती हवेली पोलिसांना दिली. हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चौकशीत प्रकाशच्या शाळेतील दोन मुलांनी त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती मिळाली. शाळकरी मुले प्रकाशच्या घराशेजारी राहत होती. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला शाळकरी मुलांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत त्यांनी प्रकाशचा खून केल्याची कबुली दिली. प्रकाशच्या शाळेतील मुलगी घराशेजारी राहत होते. प्रकाशने मुलांशी मैत्री करू नको, असे सांगितले होते. त्यानंतर तिने दोघांशी बोलणे टाळले. प्रकाशमुळे मैत्रीणीने संबंध तोडल्याने मुलगा आणि त्याचा मित्र चिडले होते. त्यानंतर त्यांनी प्रकाशचा खून करण्याचा कट रचला. गाढ झोपेत असलेल्या प्रकाशवर कोयत्याने वार करून खून केल्याचे तपासात उघडकीस आले.