MANIKRAO KOKATE / SUNIL KOKATE NEWS : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. १९९५ ते १९९७ च्या काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर लावण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु होती. आज गुरुवारी (दि. २०) न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांनी शिक्षा ठोठावली आहे. यानंतर सरकारच्या अनुदानातून घेतलेल्या घरातच माणिकराव कोकाटे यांनी व्यवसाय थाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १९९५ ते १९९७ च्या सालात कमी उत्पन्न दाखवून सध्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी सरकारच्या अनुदानातून घर घेतले होते. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरच्या परिसरामध्ये निर्माण स्कूल व्ह्यू या ठिकाणी त्यांचे घर आहे. याच घरात माणिकराव कोकाटे यांनी व्यवसाय देखील सुरू केल्याचं दिसून येत आहे.
(संग्रहित दृश्य.)
३० वर्षांपूर्वीचा वाद….
माणिकराव कोकाटे यांनी दूध डेअरी आणि प्रक्रिया केंद्र सरकारच्या अनुदानातून घेतलेल्या घरामध्येच सुरू केले होते. सध्या ते बंद अवस्थेत असल्याचे समजते. मात्र या सरकारच्या अनुदानातून घेतलेल्या घरात दूध केंद्र व्यवसायाचे उद्घाटन तत्कालीन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले होते. यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांना नाशिक कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, ही राजकीय केस होती. गेल्या ३० वर्षांपूर्वी ही केस रजिस्टर झाली आहे. त्यावेळेस दिघोळे साहेब हे राज्यमंत्री होते. माझा आणि त्यांचा राजकीय वैर होता. त्या वैरात्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावर केस दाखल केली होती. त्याचा निकाल ३० वर्षानंतर आज लागलेला आहे. न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे. मी कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे. राजकीय दृष्ट्या देशात अशा प्रकारचे अनेक निकाल लागले आहे. मी उच्च न्यायालयात जाणार आहे. जसा निकाल सुनावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. तसाच आम्हाला देखील एक नागरिक म्हणून न्याय मागण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री कोकाटे यांनी दिली आहे.
(माणिकराव कोकाटे यांचे दृश्य.)
सुनावणी वेळी कोकाटे न्यायालायात हजर
बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याच्या प्रकरणात दोन वर्ष कारावासाची शिक्षा झाल्यानंतर महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वकिलामार्फत जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. शिक्षेच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे. सुनावणीवेळी कृषिमंत्री कोकाटे हे न्यायालयात उपस्थित होते. शिक्षा सुनावल्यानंतर वकिलामार्फत त्यांनी जामिनाची प्रक्रिया सुरू केली. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यानंतर कोकाटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील सर्वच कृषिमंत्री वेगवेगळ्या प्रकरणात अडकल्याच्या प्रश्नावर त्यांनी हे प्रकरण आपण कृषिमंत्री झाल्यानंतरचे नसल्याकडे लक्ष वेधले. साधारणत: ३० वर्षांपूर्वीच्या या प्रकरणास राजकीय किनार आहे. दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्याकडून या संदर्भात तक्रार केली गेली होती. नंतर मात्र आपली त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. तेव्हा आपण राजकारणात नुकताच प्रवेश केला होता. आमदार होतो की नव्हतो तेही स्मरणात नाही. तो काळ आणि आजचा काळ यात फरक आहे. पुढील काळात माजीमंत्री तुकाराम दिघोळे व आपल्यास सलोख्याचे, मैत्रीचे संबंध निर्माण झाले. परंतु, एखादे कायदेशीर प्रकरण दाखल झाल्यानंतर कायदेशीररित्या नियमानुसार प्रक्रिया पार पडते. उशिराने ही प्रक्रिया झाली आणि न्यायालयाने आज निकाल दिला, असे कोकाटे यांनी सांगितले. कमी उत्पन्न दाखवून चार सदनिका लाटल्याच्या प्रश्नावर कृषिमंत्री कोकाटे यांनी अद्याप आपण निकालपत्र वाचलेले नसल्याचे नमूद केले. सरकारी वकिलांचे म्हणणे माहिती नाही. निकालपत्र वाचल्यानंतर यावर सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.