TIMES OF AHMEDNAGAR
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. तसेच सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला १ महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मंत्री शंभूराज देसाई यांचे मनोज जरांगेंना आश्वासन….
राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज अंतरावली सराटी येथे पोहोचताच मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती त्यांनी मनोज जरांगे यांना दिली आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकार दिरंगाई करत आहे, असा गैरसमज मनोज जरांगे यांनी करून घेऊ नये त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा, असे यावेळी शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवू, यावर येणाऱ्या हरकती या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवल्या जातील, असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत. तसेच मागील दोन महिने राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेण्यास विलंब झाला होता. मात्र यासंदर्भात मी उद्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. सगेसोयऱ्यांच्या नियमांची अधिसूचना काढण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी मनोज जरांगे यांना दिले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
मनोज जरांगेंनी उपोषण घेतले मागे….
शंभूराज देसाई यांच्या आश्वासनानंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले असून त्यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. तसेच १३ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. लोकांचा शब्द डावलून जर एक महिण्याच्या आत मागण्या मान्य न झाल्यास आम्ही निवडणुकीत उतरणार, ते शक्य नाही झाले तर २८८ मतदानसंघात नाव घेऊन उमेदवार पाडू, असे ते म्हणाले आहेत. शंभूराज देसाई आले म्हणून मी सरकारला एक महिन्याची वेळ देतो आहे. जर एक महिन्यात आरक्षण न मिळाल्यास आपण सत्तेत जाऊन आरक्षण घेऊ, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.