अ.नगर : नगरकरांनी सलग पंचवीस वर्ष शिवसेनेला निवडून दिल आहे. दोन वेळा शिवसेनेचा अत्यंत कमी फरकाने पराभव झाला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात शहराची जागा जरी शिवसेनेला सुटली नसली तरी देखील महाविकास आघाडीला मिळालेली मते ही शिवसेनेचीच आहेत. अहिल्यानगरकरांच्या मनात आजही हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, हिंदू धर्मरक्षक स्व. अनिलभैय्या राठोड यांची शिवसेनाच आहे, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विभागवार बैठकांचे सत्र सुरू केले आहे. या अंतर्गत सावेडी उपनगर विभागातील प्रमुख शिवसैनिकांची पहिली बैठक पार पडली. यावेळी किरण काळे बोलत होते. यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अंबादास शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे, कामगार सेनेचे विलास उबाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, सावेडी उपनगर उपशहर प्रमुख प्रशांत पाटील, कामगार सेना शहर प्रमुख गौरव ढोणे, अहिल्यानगर विधानसभा युवासेना युवा अधिकारी आनंद राठोड, केशव दरेकर, सुजय लांडे, ऋतुराज आमले, विजय सानप, तुषार लांडे, सुनील भोसले, अण्णा कोडम, किशोर कोतकर, शंकर आव्हाड, आकाश अल्हाट, आनंद जवंजाळ, विकास भिंगारदिवे, गणेश आपरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलत असतांना किरण काळे म्हणाले कि महानगर पालिका निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी आपापल्या भागामध्ये संपर्क मोहिम राबवावी. ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते जरी आज गद्दार सेनेत गेले असले तरी सामान्य शिवसैनिक, शिवसेनेचा मूळ मतदार आजही जागेवर आहे. महानगर पालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेना स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढली. स्वतंत्र लढून देखील शिवसेनेचे चोवीस नगरसेवक निवडून आले होते. बसपाचे चार नगरसेवक शिवसेनेच्या आशीर्वादाने निवडून आले होते. तर सहा ते आठ जागा या आपण केवळ चाळीस ते सव्वाशे मतांच्या अल्प फरकाने हरलो होतो. भाजपने ऐन वेळेला दगा दिल्यामुळे स्वबळावर लढण्याची भूमिका आपण घेतली होती. पूर्व तयारीने लढलो असतो तर त्याच वेळी एक हाती सत्ता येत महानगर पालिकेवर शिवसेनेचा स्वबळावर भगवा फडकला असता. आजही अहिल्यानगरकरांना शिवसेनेकडून शहर विकासाची अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ताकदीने महानगर पालिका निवडणूक लढायची आहे. सावेडी उपनगरातील लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा. पिण्याचे पाणी, कचरा संकलन, पावसाळ्या पूर्वीची नालेसफाई, रस्त्यांची रखडलेली अर्धवट कामे आदी प्रश्नांवर आवाज उठवा. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करा, असे आवाहन यावेळी बोलताना काळे यांनी शिवसैनिकांना केले.