TIMES OF NAGAR
मुंबईपासून अंतरावर असणाऱ्या भिवंडीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साडेचार वर्षांपूर्वी म्हणजेच (दि.२०) नोव्हेंबर २०२० रोजी अचानक बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय शोएब शेखच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य अखेर उलगडलं आहे. ठाणे क्राईम पोलीसने या प्रकरणात एक धक्कादायक कारवाई करत मौलवी गुलाम रब्बानी शेख याला अटक केली आहे. या मौलवीने शोएब शेखची निर्घृणपणे हत्या केली होती आणि त्याचे शरीराचे छोटे-छोटे तुकडे करून काही कचऱ्यात फेकले होते. तर काही अवशेष स्वतःच्या किराणा दुकानात गाडून टाकले होते. ही घटना अक्षरशः एखाद्या थरारक चित्रपटात घडावी अशी असून अनेकांना अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटाची आठवण करून देणारी आहे. शोन काहीएब शेख हा भिवंडीच्या नवी बस्ती नेहरू नगर भागात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे प्रेम त्याच्यावर होते. (दि.२०) नोव्हेंबर २०२० रोजी तो अचानक बेपत्ता झाला. त्याच्या अपहरणाची तक्रार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने पोलिसांनाही शोधकार्य करण्यात अपयश येत होते. गुलाम रब्बानी शेख हा नेहरू नगरमधील एका मशिदीत अजान देण्याचा काम करत होता. त्याचबरोबर तो बाबागिरी करायचा आणि किराणा दुकानही चालवत होता. त्याच्या दुकानात एका अल्पवयीन मुलाला देखील कामावर ठेवले होते. पण याच दुकानात तो अल्पवयीन मुलांसोबत दुष्कृत्य करत असल्याची माहिती पुढे आली. हे कुकर्म शोएबने पाहिले होते आणि तो हा प्रकार सर्वांना सांगेल या भीतीने मौलवीने त्याला गप्प राहण्यासाठी सांगितले होते. त्याबद्दल मौलवी शोएबला पैसे देत होता. परंतु काही दिवसांनी शोएब शेखची मागणी वाढत त्याने दुकानातून सामान घेऊन पैसे देणंही बंद केलं होतं आणि नंतर मौलवीकडून पैसे उकळायला सुरुवात केली होती. याला कंटाळून मौलवीने एक दिवस शोएबला दुकानात बोलावून त्याचा गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह दुकानातच गाडून टाकला. आठ महिन्यांनंतर जेव्हा गाडलेल्या शवाचा काही भाग जमिनीवरून बाहेर यायला लागला तेव्हा मौलवीने त्याचे छोटे छोटे तुकडे करून दुकानात काम करणाऱ्या दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या हातून ते कचऱ्यात टाकून दिले. त्यानंतर उरलेले शव पुन्हा गाडून वर टाईल्स बसवल्या. या संपूर्ण प्रकरणात मौलवीन शोएबच्या कुटुंबाला खोटी आश्वासने देत राहिला. कधी अजमेर शरीफच्या नियाजचा सल्ला कधी बकऱ्याची बली या सगळ्या उपायांमधून तो कुटुंबाला फसवत राहिला. दोन वर्षे हा प्रकार चालू होता. २०२३ मध्ये अचानक शोएबच्या आईला कोणीतरी सांगितलं की तिच्या मुलाचा खून अजान देणाऱ्या मौलवीनेच केला आहे. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.
(संग्रहित दृश्य.)
मौलवी विरोधात लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा
चौकशी सुरु असताना मौलवी गुलाम रब्बानी शेख हा गर्दीचा फायदा घेत पोलीस ठाण्यातून फरार झाला होता. या मौलवीने ज्या अल्पवयीन मुलांवर अत्याचार केले होते त्या अल्पवयीन मुलाने देखील २०२३ मध्ये या मौलवी विरोधात लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. फरार झालेल्या मौलवीने दिल्लीमार्गे उत्तराखंडच्या रुडकी जिल्ह्यात गेला आणि तिथे ओळख बदलून एका मशिदीत पुन्हा मौलवी म्हणून काम करू लागला. उत्तराखंडमध्ये एका वादात त्याने मी कित्येकांना कापून गाडलं आहे असं धमकीवजा विधान केलं आणि त्याच्या माहितीचा शोध घेतल्यावर समोर आलं की तो भिवंडीचा वॉन्टेड आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ठाणे क्राईम प्रॉपर्टी सेलच्या टीमने मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे उत्तराखंडमध्ये पोहोचून मौलवी गुलाम रब्बानी याला अटक केली. आरोपीने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्या दुकानात शव गाडल्याचेही मान्य केले. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने त्या दुकानात खोदकाम केल्यानंतर शोएबच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. सध्या ठाणे क्राईम प्रॉपर्टी सेल या खून आणि अपहरण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. शोएबच्या कुटुंबाने आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. शोएबच्या आईने रडत सांगितले की माझा मुलगा खूपच निरागस होता. त्याचा इतक्या क्रूरपणे खून करणारा आमच्याच शेजारी राहात होता हे आम्हाला कधीच कळलं नाही. आज तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी. अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.