मुंबई : नागपूरच्या महल हंसापुरी आणि भालदारपुरा या परिसरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन हिंसाचार उसळलेला पाहायला मिळाला होता. मात्र ही दंगल महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये घडवण्याची योजना होती. परंतु त्याची ठिणगी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघात पडली. हे कोणीतरी जाणीवपूर्वक घडवून आणले आहे का ? याचा तपास झाला पाहिजे असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते गुरुवारी (दि.२०) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न झाला. पण हे प्रकरण सरकारवरच उलटले. दंगल ही नागपूरमध्ये झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दंगल घडवण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनाही नागपूरमध्ये आपल्या मतदारसंघात दंगल घडेल हे अपेक्षित नसावे. हे ज्या कोणी घडवलं त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कमजोर दाखवायचे आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाची जाणीवपूर्वक निवड करण्यात आली. हा तपासाचा विषय आहे. असे संजय राऊत यांनी म्हटलय. औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावरुन राज्यात अनेक ठिकाणी दंगली घडवण्याची योजना आखण्यात आली होती. पण ठिणगी ही मुख्यंमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यात मतदारसंघात कशी पडली, या सगळ्यामागे कोण आहे. असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरुन भाजपमधील जे लोक बोलत आहेत. ते लोक बाटगे आहेत. यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्त्व, मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर पूर्वी चिखलफेक केली आहे. मात्र, आज हेच लोक भाजपचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. यासारखं दुसरं हिंदुत्त्वाचं दुर्दैव नाही. या सगळ्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रकरण त्यांच्यावरच उलटले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
(संग्रहित दृश्य.)
दिशा सालियन प्रकरण
दिशा सालियन हिच्या वडिलांनी पाच वर्षांनी तपास पुन्हा सुरु करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्यावर दबाव होता. असे ते म्हणाले. यावर कोण विश्वास ठेवणार ? या माध्यमातून ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटल्यामुळे त्यामधून मुक्त होण्यासाठी दिशा सालियन प्रकरणाचा वापर केला जात आहे. यामागे कोणाची प्रेरणा आणि शक्ती आहे. याची आम्हाला माहिती आहे. अशाप्रकारचे राजकारण तुम्हालाच लखलाभ असो. एका तरुण नेत्याच्या करिअरवर तुम्ही चिखल उडवत आहात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकारणात कोणत्या थराला जायचे, हे महाराष्ट्रातील नेत्यांनी ठरवले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.