TIMES OF NAGAR
ज्ञान हीच शक्ती समजून लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळीचा आधार घेवून उभे केलेले काम सामाजिक, आर्थिक समता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरले. याच विचाराने ग्रामीण विकासाचा निर्देशांक २६ टक्कयांपर्यंत आपल्याला न्यावा लागेल. जलसंवर्धना बरोबरच तंत्रज्ञान, विज्ञान आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देवून देश विश्वगुरु बनेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबध्द केलेल्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राच्या दुस-या आवृत्तीचे प्रकाशन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास ना. राधाकृष्ण विखे पाटील आ.शिवाजीराव कर्डीले, आ.मोनीका राजळे, आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.शिवाजीराव कर्डीले, आ.विक्रमसिंह पाचपुते, आ.अमोल खताळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, सौ.शालिनीताई विखे पाटील, सौ.सुवर्णा विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग आदि याप्रसंगी उपस्थित होते.
(संग्रहित दृश्य.)
बाळासाहेब विखे पाटीलांच्या त्या भेटीचा गडकरींनी सांगितला किस्सा…
आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यातील विचार हा आपल्या सर्वांना प्रेरणादायी असल्याचे सांगून या देशामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरु करण्यासाठी अर्थ राज्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या सहकार्याची आठवण सांगून त्यांच्याकडे ग्रामीण विकासाचा एक दृष्टीकोन होता. ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवायचे असेल तर, विकासाला प्राधान्य द्यावे लागले, यावरच त्यांची निष्ठा होती. याकडे लक्ष वेधून नितीन गडकरी म्हणाले की शेती विकासाची कोणतीही व्यवस्था किंवा साधनं नसल्यामुळे विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरला. पण ही परिस्थिती आता बदलत आहे. जल संवर्धनाला प्राधान्य दिल्यामुळेच या भागातील शेतकरी आता उर्जादाता बनत असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील रस्ते विकासाला प्राधान्य देताना ग्रामीण भागही शहरांना जोडण्याचा प्रयत्न करीत असून, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व रस्ते प्राधान्याने पुर्ण करण्यासाठी काम सुरु आहे. नांदुर शिंगोटे, सिन्नर या रस्त्यांबरोबरच सुरत-चैन्नई आणि अन्य रस्ते पुर्ण करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च येणार नाही असे सांगून या रस्त्यांची कामे करतानाच जिल्ह्यातील जल संवर्धनाच्या कामालाही आमचा विभाग मदत करेल. नाले आणि तलाव निर्माण करुन या जिल्ह्यातील सिंचन वाढले तर जिल्ह्याची परिस्थिती अधिक बदलेल असा विश्वास व्यक्त करुन ग्रामीण विकासाचा निर्देशांक १२ टक्क्यांवरुन आपल्याला २६ टक्क्यांवर न्यावा लागेल. यासाठी शिक्षणालाही प्राधान्य द्यावे लागेल. ज्ञानार्जन व्हावे म्हणून प्रयत्न करताना तंत्रज्ञान विज्ञान आणि कौशल्य विकास यावरच लक्ष केंद्रीत करावे लागेल.