सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रामहिंगणे गावात कौटुंबिक वादातून एका जावयाने थेट आपल्या सासऱ्याचा चाकूने हल्ला करत खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर यात सासू आणि मेव्हणा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बापूराव तुळशीराम मासाळ मृत सासऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मंगेश सलगर याचा आपल्या पत्नीशी गेल्या अडीच वर्षांपासून वाद सुरू होता. पत्नी सासरी परत न आल्यामुळे आरोपी सलगर संतापलेला होता. दरम्यान त्याच्या पत्नीने न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला होता. यामुळे तो अधिकच संतप्त झाला. या पार्श्वभूमीवर (दि.२७ ) एप्रिल रोजी रात्री मंगेश सलगर याने आपल्या सासरी जात सासरच्या लोकांवर चाकूने हल्ला केला. आरोपीने सासू सासरे आणि मेव्हण्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात बापूराव मासाळ यांचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मंगेश सलगर याने ११२ नंबरवर पोलिसांना फोन करून मला या ठिकाणी मारहाण करत आहेत. मला वाचवा अशी माहिती दिली. मोहोळ पोलिसांचे पथक तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले असता. त्यानेच खून करून इतर दोघांना जखमी केल्याचे दिसले. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश सलगर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, बापूराव मासाळ यांचा मोठा मुलगा बाळकृष्ण मासाळ याचे दि.६ मे रोजी लग्न ठरले होते. मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.