आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच राज्यातील महायुतीमध्ये विसंवादाचे सूर उमटायला लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांबाबत दिलेली परस्परविरोधी वक्तव्यं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहेत. पुण्यातील यशदा येथे महापालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या परिषदेदरम्यान दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना महायुतीच्या आगामी निवडणूक रणनितीबाबत दोघांचे सूर वेगळेच ऐकायला मिळाले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीने लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या आणि प्रचंड यश मिळवलं. त्यामुळे आता आमची जबाबदारी वाढली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकाही आम्ही महायुती म्हणून एकत्रच लढणार आहोत आणि त्या जिंकणार देखील आहोत.दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अधिक संयत भूमिका घेत स्पष्ट केलं की, महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, काही ठिकाणी अपवाद असू शकतात. त्या ठिकाणी आमच्यात समजुतीनुसार वेगळी भूमिका घेऊ. एकमेकांवर टीका न करता, जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही एकत्र लढणार आहोत. महायुतीने जर एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर नेतृत्व कोणाचे असेल आणि उमेदवारी वितरण कसे होईल, यावरून देखील मोठे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांच्या विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची चिन्हं आहेत.