विधानसभा निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार थांबविण्यात येणार आहे. तसेच अधिसूचना जारी झाल्यापासून २८ दिवस निवडणूक प्रचार सुरू होता. त्यानंतर आज सर्व नेते आपआपल्या होमग्राऊंडवर सभा आणि पदयात्रा करणार असल्याची माहिती आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची रविवारी सोलापुरात सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. सगळ्यांचा नाद करायचा पण माझा नाही, अशा शब्दात त्यांनी चांगलेच सुनावले आहे.
(संग्रहित दृश्य.)
महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा?
एकदा एखादा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जोरात पाडायचे आहे. असे पाडायचे की त्याचा पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. तसेच सगळ्यांचा नाद करायचा पण माझा नाही, अशा शब्दात शरद पवारांनी सुनावले आहे. काल ते सोलापुरातील टेंभूर्णी येथे प्रचारसभेत बोलत होते. या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आमचा विजय होईल, हे तर ठरलेलंच आहे. मात्र महाविकास आघाडीने जी पंचसूत्री जाहीर केली, ते माझ्या राज्यातील नागरिकांच्या विकासासाठी प्रत्यक्षात राबवण्यासाठी आम्हाला तुमचीच मदत पाहीजे. काही महिन्यापूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली होती. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राची सत्ता दिली होती. त्यांचा पाच वर्षांचा अनुभव बघितला. तर आज इथे सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पर्याय आपल्या सगळ्यांसमोर नाही. सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी करणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणे हे ऐतिहासिक काम उद्याच्या २० तारखेला तुम्हा सर्वांना करायचे आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांनी तुम्ही विजयी करा. माझी खात्री आहे, महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही, असं आवाहनही शरद पवारांनी केलं आहे.