जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (दि.२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. मृतांपैकी दोघे पुण्यातील रहिवासी आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात काही लोक जखमी झाल्याचीही माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहलगाम दहशतवादी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये दोन पुण्याचे, तीन डोंबिवलीचे आणि एक पनवेलचा रहिवासी आहे. पुण्यातील मृतांची ओळख संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गंबोटे अशी झाली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील तीन मृत पर्यटकांची ओळख पटली आहे. त्यांची नावे संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी आहेत. महाराष्ट्रातील सर्व पर्यटक शनिवारी (दि.१९ एप्रिल ) त्यांच्या कुटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. डोंबिवलीतील ठाकूरवाडी परिसरातील रहिवासी अतुल मोने, डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान परिसरातील रहिवासी हेमंत जोशी आणि सुभाष रोड परिसरातील रहिवासी संजय लेले हे देखील त्यांच्या कुटुंबियांसोबत गेले होते. याशिवाय दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या महाराष्तीट्लरातील पर्यटकांमध्ये मुंबईतील बालचंद्रन आणि शोभित पटेल यांची नावे समोर आली आहेत. जखमींमध्ये आसावरी जगदाळेचा सुद्धा समावेश आहे. आसावरी यांनी अत्यंत थरकाप उडवणारा प्रसंग कथन केला आहे. आसावरी जगदाळे यांच्या वडिलांना सुद्धा गोळी लागली असून त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की आम्हाला प्रचंड भीती वाटत आहे, कुठं काय होईल याची भीती आम्हाला वाटत आहे. सगळीकडे आर्मी असते, नाका नाक्यावर चेकपोस्टस् आहेत, पण जिथं गरज होती तिथं मदतीसाठी आम्हाला आवाज द्यायला कोणीच नव्हतं. ना पोलिस, ना मिलिटरी होती, त्यांनी रेस्क्यू केलं. ते कर्तव्य आम्ही आमच्यांना गोळ्या लागताना पाहिलं.
(संग्रहित दृश्य.)
दोन धर्मातील काही वाईट प्रवृत्तींमुळे चांगल्या लोकांना फेस करावं लागतं
असावरी यांनी सांगितलं की तुम्ही बसून ऐकत आहात पण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय आम्ही काय पाहिलं आमचं आम्हाला माहिती आहे. त्या म्हणाल्या की, मला एकाच गोष्टीचं प्रचंड वाईट वाटतंय की हिंदू मुस्लीम वादामध्ये जी सामान्य लोक एकमेकांना हिंदू मुस्लीम भाऊ बहिण अशा नात्याने राहतात किंवा घट्ट मैत्री असते. या दोन धर्मातील काही वाईट प्रवृत्तींमुळे चांगल्या लोकांना फेस करावं लागतं. या वादामुळे सामान्य लोकांनी का फेस करावं? आम्ही पैसे देऊन फिरायला आलो होतो, अशा ठिकाणी आम्ही येऊन थांबलो आमच्या हातात काहीच नाही. आम्हाला लवकरात लवकर सरकारकडे पोहोचण्यात यावं ही आमची सरकारकडे मागणी आहे. राजकारणाशी आमच्या भावनांशी खेळू नका. दरम्यान,२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात मोठा हल्ला आहे. पहलगाम शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेले बैसरन हे घनदाट पाइन जंगले आणि पर्वतांनी वेढलेले एक विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे आणि देश आणि जगभरातील पर्यटकांमध्ये ते एक आवडते ठिकाण आहे. अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळी सशस्त्र अतिरेकी आले आणि त्यांनी रेस्टॉरंट्समध्ये फिरणाऱ्या, खेचरांवर स्वार होणाऱ्या आणि पिकनिक करणाऱ्या पर्यटकांवर गोळीबार केला. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची आघाडी संघटना, रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यात २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.