काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर ही चर्चा आता खरी ठरली आहे. रवींद्र धंगेकर यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस पक्षाला रामराम केल आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर म्हणाले, अशा प्रकारचा (पक्ष सोडण्याचा) कोणताही निर्णय हा प्रचंड कठीण असतो.धंगेकर म्हणाले,मी गेल्या १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम करत आहे. पक्षाबरोबर एक कौटुंबिक नातं तयार झालं आहे. पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली, या काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली होती. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. मी निवडणुकीत पराभूत झालो ती वेगळी गोष्ट आहे. मात्र पक्षातील लोकांनी माझ्यासाठी कष्ट केले. सर्वांनी माझ्याबरोबर ताकद उभी केली होती. त्यामुळेच आता पक्ष सोडताना मला खुप दुःख होत आहे.
(संग्रहित दृश्य.)
एकदा आच्याबरोबर काम करा.
माजी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, आपण सगळी माणसं आहोत. अशा प्रसंगी आपल्याला दुःख होतंच. मात्र, कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून सांगत होते, चर्चा करत होते. माझी मतदारांशी चर्चा झाली. त्या सर्वांचं म्हणणं आहे की आमची कामं कोण करणार ? लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना आपण न्याय देऊ शकत नाही, त्यांची कामं करू शकत नाही. अशा वेळी माझी दोन-तीन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली. मी त्यांच्याशी चर्चा केली. मंत्री उदय सामंत हे देखील माझे मित्र आहेत. माझी त्यांच्याशी देखील चर्चा झाली. त्यांनी वारंवार सांगितलं की एकदा आच्याबरोबर काम करा.
(संग्रहित दृश्य.)
सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत.
रवींद्र धंगेकर म्हणाले, मी शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या बातम्या मधल्या काळात वर्तमानपत्रांनी दिल्या होत्या. त्यानंतर डोक्यावरून बरंच पाणी गेलं. दरम्यान, माझ्या मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील. मात्र, सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत. याच काळात मी एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. तसेच मी आमदार असताना आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्यांचा चेहरा जनतेत लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या चोहऱ्याबरोबर जाण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आज संध्याकाळी मी त्यांना भेटणार आहे. त्यानंतर आमचा जो निर्यय होईल तो जाहीर करू.