लातूर : मंगळवारी (दि.११ ) लातूर शहरातील अंबाजोगाई रस्त्यावर एका तरुणाला ५ ते ६ जणांनी बेदम मारहाण केली. व ते दुचाकी वर बसून पळून गेले. १०० ते १५० लोक झालेला प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होते. मात्र कोणीही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्यापैकी ४ आरोपीच्या मुस्क्या आवळल्या व रस्त्यावरून त्यांची धिंड काढत त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मंगळवारी काही तरुण अंबाजोगाई रस्त्यावरील एका बारमध्ये बसले होते. बार मधून ते बाहेर आल्यानंतर रस्त्यावर जाणाऱ्या एका तरुणाला त्या ५ ते ६ जणांनी बेदम मारहाण केली. दगडाने मारले तो बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला असताना सगळ्यांनीच दुचाकीवरून पोबारा केला. संबंधित तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले हा सगळा प्रकार रस्त्यावर सुरू असताना बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमलेली होती. पण कोणीही त्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आरोपी ५ ते ६ जण तरुण तगडे व आक्रमक होते. त्यामुळे कोणीच त्यांना अडवण्याचे धाडस केले नाही. पोलिसांनी ४ तासातच त्यापैकी चार जणांना पकडले व भर रस्त्यावरून त्यांची धिंड काढत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. या प्रकारानंतर शहरात झाले ते चांगले झाले पोलिसांची दहशत असलीच पाहिजे अशी चर्चा लोकांनी केली. लातूर शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते व या शहरात रस्त्यावर भर दिवसा मारहाण होते. व आरोपी पसार होतात हा प्रकार शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंता वाढवणारा होता. पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांची रस्त्यावरून वरात काढली या प्रकारामुळे काही प्रमाणात पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.