नागपूर: नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार आहे. १९९२ नंतर नागपूरमध्ये दंगलीसारखी कोणतीही मोठी घटना घडली नाही. त्यामुळे आता या दंगेखोरांना आता सरळ केलं नाही तर त्यांना सवय पडेल. त्यामुळे दंगेखोरांवर कारवाई करताना पोलिसांकडून कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही. असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दि.२२ नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की पोलिसांनी ४ ते ५ तासांत दंगल नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला. या सगळ्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर पोलिसांनी दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज लोकांना मोबाईलवर केलेले चित्रीकरण या आधारे दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत १०४ दंगलखोरांची ओळख पटली आहे. त्यापैकी ९२ जणांना अटक केली आहे. तर १२ जण अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरही विधिसंघर्षित कायद्यानुसार कारवाई सुरु आहे. आणखी काही लोकांना अटक करण्याचा पोलिसांचा मानस आहे. जो व्यक्ती दंगल करताना दिसतोय किंवा दंगलखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई करण्याच्या मानसिकतेत पोलीस आहेत. मोठ्याप्रमाणावर सोशल मिडिया ट्रॅकिंग करुन ज्या लोकांना दंगल भडकावण्यासाठी चिथावणी दिली त्यांनाही सहआरोपी केले जाणार आहे. आतापर्यंत एकूण ६८ पोस्ट डिलिट करुन कारवाई करण्यात आली आहे. ज्या लोकांनी भडकावणारं पॉडकास्ट केलं अफवा पसरवल्या अशा सर्व लोकांवर कारवाई होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
(संग्रहित दृश्य.)
नुकसान झालेल्या लोकांना भरपाई मिळणार: देवेंद्र फडणवीस
ज्या लोकांचं नुकसान झाले आहे, गाड्या फुटल्या आहेत, त्यांना येत्या ३ ते ४ दिवसांत नुकसान भरपाई मिळेल. नागपूरमधील संचारबंदीमुळे जे काही निर्बंध आहेत, त्यामुळे जनजीवन आणि व्यापारावर परिणाम झाला आहे. आता वातावरण शांत असल्याने यामध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न आहे. मात्र पोलीस पूर्णपणे सजग राहतील. दंगलीत झालेले नुकसानीचे पैसे दंगेखोरांकडून वसूल केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपूर हिंसाचाराची सूत्रे बांगलादेशातून हलवण्यात आली की नाही हे आताच सांगता येणार नाही. मात्र या दंगलीचे मालेगाव कनेक्शन स्पष्ट आहे. दंगलीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अभद्र व्यवहार झाल्याचे सांगितले जात होते. मात्र मी पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली. त्यांनी असा कोणताही अभद्र व्यवहार झाला नसल्याचे सांगितले. महिला पोलिसांवर दंगलखोरांनी दगडफेक केल्याचे त्यांनी सांगितले.