मतदारयादीमध्ये हेरगिरी करून नावे परस्परपणे कमी केली जात असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीकरून करण्यात आला आहे. शुक्रवार (१८ऑक्टोबर) महाविकास आघाडीकडून शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास महायुतीकडून महायुती सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. संयुक्त पत्रकार परिषद घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचले.
(संग्रहित दृश्य.)
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करते….
जितेंद्र आव्हाडे म्हणाले की प्रत्येक मतदारसंघातून ५ हजार नावे कमी करण्याचा डाव महायुती सरकारकडून करण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की फॉर्म नंबर सात हा ऑनलाईन भरण्याची पद्धत चुकीची आहे. प्रत्येक मतदारसंघातून ५ हजार नावे कमी करण्याचा डाव आहे. सिन्नरमध्ये अशीच पाच हजार नावे वगळण्यात आली होती, मात्र आक्षेप घेतल्यानंतर परत आली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. त्यांनी सांगितले की मतदार यादी सुद्धा चुकीच्या पद्धतीने छापली गेली आहे. त्यामुळे निवडणूक पद्धत संशयास्पद आहे.या सर्व प्रक्रियेमुळेच मतदानाची टक्केवारी घसरत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकाच घरातील पाच नावे वेगळ्या केंद्रावर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान महायुती सरकारने घेतलेल्या शासन निर्णयावर सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की आचारसंहिता लागू झाल्यानंतर १२२ शासन निर्णय काढण्यात आले. अनेक टेंडर सुद्धा काढण्यात आले. नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या. या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून हे सर्व रद्द झालं पाहिजे अशी मागणी आव्हाड यांनी केली. मतदार यादीमधून नावे गहाळ करण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. प्रत्येक मतदारसंघातून दहा ते वीस हजार नावे कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. फॉर्म नंबर सातचा वापर करून मतदार यादीमधून नावे कमी केले जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.