TIEMS OF NAGAR
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या भेटीत राजकीय चर्चा नसल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे उदय सामंत म्हणाले. राजकीय चर्चा झाली तर कळेल असंही उदय सामंत म्हणाले. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. बीड शहरातील एका हॉटेलमध्ये गुंतवणूकदारांच्या उपस्थितीत ही परिषद होत असून यावेळी खासदार संदिपान भुमरे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील उद्योजक गुंतवणूकदारांची उपस्थिती आहे. यावेळी बीड जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासंदर्भात उद्योग मंत्री चर्चा करणार असून उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी देखील या परिषदेत प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर सामंत बोलत होते. बीडमध्ये आज उद्योग परिषद घेण्यात आली आहे. स्थानिक उद्योजकांनी ९०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांना समज दिली आहे जे टार्गेट आहे ते पूर्ण झाले पाहिजे असे सामंत म्हणाले. ३२ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. पुन्हा बीड मध्ये येणार आणि त्याचा आढावा घेणार असल्याचे सामंत म्हणाले. बीडच्या तरुणांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास केंद्राची स्थापना महाराष्ट्रात पाच ठिकाणी केली आहे. त्यात आणखी एक केंद्र होणार असल्याचे सामंत म्हणाले. बीडमध्ये कौशल्य विकास केंद्र बीडमध्ये उभारणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत म्हणाले.